Tuesday, 22 March 2016

माघार

कुठवर जपायचे फक्त 'मी' ला,
शेवटला शब्द आपलाच असण्याला,
एकटेच शहाणे नसतो आपण,
कशाला डोळ्यांवर नको ते ढापण?
जगणे असते - नसते स्पर्धा,
मोजत बसणे उणा, अर्धा
प्रत्येकाचे स्वतंत्र मत,
पण 'नात्यांना' असतेच ना किंमत
मग मोजावी कधी ती संयमाने,
रागावर मात करावी मायेने
सोडून देऊन बालिश हट्ट
आपली माणसे जपावी घट्ट
नात्यांमध्ये मान असावा,
एक मंत्र मात्र लक्षात हवा,
'जेत्यापुढे लाचार नसते,
प्रत्येक माघार हार नसते'.