Friday, 10 July 2015

आमचा diet plan

'आजपासून ठरलं ' यांनी घरात शिरता शिरताच घोषणा केली. 'हं ' मी मनात म्हटलं, आज काय नवीन? 'ऐकलंस का वैशु, मला कोमट पाणी आण जरा लिंबू आणि मध घालून.' 'काय?' मी जवळ जवळ ओरडलेच. आज गरमागरम चहाच्या ऐवजी चक्क लिंबू पाणी आणि तेही कोमट? 'काय हो, बरे आहात न?' 'येस, बरा आहे, आजपासून ठरलंय माझं- मी diet चा एक प्लान फॉलो करणार आहे. वैशु, आपली आजकालची जीवनपद्धती, राहणीमान यांचा विचार करता आपण गरजेपेक्षा खूप जास्त खातो, असं नाही तुला वाटत?' ' तुमचं आजकालचं वजन पाहता नक्कीच वाटतं' मी मनात म्हटलं. 'हा सगळा चुकीच्या आहाराचा परिणाम आहे. पूर्वीची माणस अशी सुटलेली दिसायची नाहीत कारण सात्विक आहार. आपण हल्ली सारखा चहा पितो, त्यातून किती साखर पोटात जातेय याची कल्पनाही नसेल तुला.' हि कल्पना यांना आल्याची कल्पना मला खरोखरच न आल्यामुळे मी नकळत पुढे केलेला चहा तितक्याच नकळत संपवून यांनी कप खाली ठेवला. 'तू पण तुझी कॉफी जर कमीच कर. आमच्या ऑफिसातला तो नायर ५किमीची marathon  पळाला. गेल्या महिन्यापर्यंत केवळ गाडी ते लिफ्ट आणि लिफ्ट ते त्याचं टेबल एवढंच चालायचा. त्याने रेस पूर्ण केली, विचार कशी?' 'कशी?' माझी दिवसभरातील एकमेव विसावा असलेली कॉफी काढल्यामुळे आलेला राग न दाखवता मी आज्ञाधारकपणे विचारले.  'diet plan, हे बघ मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे तुला दाखवायला. 'बापरे' मी जरा घाबरतच ती लिस्ट हातात घेतली.

'ते बघ' लिस्ट मधील एक एक गोष्ट समजावून सांगत हे बोलू लागले, 'सकाळी उठल्या उठल्या लिंबू पाणी, मग केवळ एक फळ. पण कोणतेही नाही हं, वजन वाढवणारी फळे वर्ज. आंबे, केळी, सीताफळ, सफरचंद चालणार नाहीत.' 'अहो पण मग आणखी कुठली फळे असतात?' मी न राहवून विचारले. मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे फळवाल्याच्या गाडीवर सामान्यतः जी फळे दिसतात तेवढीच माहित. 'डाळिंब फार चांगलं तब्येतीला. तू असं करत जा, सकाळी चहाच्या ऐवजी डाळींबाचा ज्यूस पीत जाईन मी.' 'अहो पण मग दाणेच खा न डाळिंबाचे.' मी म्हणत होते, पण तो पर्यंत यांचा उत्साह लिस्ट मधील पुढच्या गोष्टीकडे वळला होता. ' मग नाश्ता बरं का वैशु …. ' 'म्हणजे? अजून नाश्ता आहे?' मी बोलून गेले. 'अग, शरीराला कॅल्शियम नको का मिळायला? हे बघ नाश्त्याला गाईच्या दुधाबरोबर कोर्नफ्लेक्स, साखर नाही, वाटल्यास थोडा मध. नो पोहे, उपमा. बघ, तुझं सकाळचं काम किती कमी करतोय मी.' 'खरंच ' मी म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर गाळण्यात डाळिंबाचे दाणे चिरडून खाली ग्लासात थेंब थेंब पडणारा रसाभिषेक भक्तिभावाने पाहणारी मी दिसू लागले. 'पुढे?' मी विचारले, ' जेवणाचे काय?' 'थांब, हे पहा, सकाळी अकराच्या सुमारास थोडी भूक लागते आपल्याला, तेव्हा मिड मोर्निंग नाश्ता म्हणून गाजर, काकडी असं काहीतरी देत जा डब्यात. आणि मग नेहमीसारखी पोळी भाजी. संध्याकाळी आल्यावर मोड आलेली कडधान्य खात जाईन आणि मग रात्री फक्त भाकरी आणि पालेभाजी नो भात.'  संध्याकाळी चिवडा, लाडू, कचोरी, बाकरवडी, बटाटेवडा किंवा अगदीच काही नाही तर चिप्स, वेफर्स यांची जागा चक्क मोड आलेल्या कडधान्यांनी घेतलेली पाहून गहिवरूनच आले मला. 'एवढ्याने भागेल का तुमचं?' मी न राहवून विचारले, ' आणि अक्ख्या दिवसात चहा नाही? असं एकदम सगळं बंद करण्यापेक्षा हळूहळू कमी करत आणलत तर?' 'हेच हेच, तुम्ही बायका पाय मागेच खेचा. आता मी ठरवलंय, त्यात बदल नाही.' हे निश्चयाने म्हणाले, 'उद्यापासून लिफ्ट सुद्धा वापरणार नाहीये मी, रोज पाच वाजता उठून मोर्निंग वॉक. तू सुद्धा यायचं आहेस माझ्याबरोबर.' 'पाच? नको हो' माझा स्वर फारच केविलवाणा झाला असावा कारण नंतर यांनी फार ताणून धरले नाही. तेवढ्यात कन्यारत्न क्लासमधून आणि चिरंजीव फुटबॉल खेळून वर आले. आणि मग जिम लावावी कि घरीच व्यायाम करावा यावर तिघांचा परिसंवाद सुरु झाला.

माझ्या डोक्यात गृहिणी सुलभ calculations सुरु झाली होती. डाळींबाचा ज्यूस नाही का, किलो दोन किलो डाळिंब आणून ठेवायला हवीत. गाजर, काकड्या आणि हो जास्तीची कडधान्य सुद्धा. दुधवाल्याला उद्यापासून गाईचे दुध सांगायला हवे. या निमित्ताने कोर्नफ्लेक्स ची हि खरेदी होणार. पालेभाज्या आणून निवडून ठेवायला हव्यात. आणि रात्री भाकरी म्हणजे तेही पीठ दळून आणायला हवं. भाकरीला हल्ली फारच चांगले दिवस आलेत म्हणायचे. पूर्वी भाकरी म्हणजे गरिबांचं अन्न म्हणून नाकं मुरडायचे लोक. लगेच पिशव्या घेऊन बाहेर निघाले. आईबरोबर बाहेर पडायचे आणि तेही भाजी आणायला म्हणजे चिरंजीवांना मोठेच संकट, त्यामुळे ते जिम मध्ये वेट लिफ्टिंग करायला पळाले. कन्यारत्नाला खूप म्हणजे खूपच अभ्यास होता त्यामुळे त्या स्मार्ट फोनवरूनच रिसर्च करण्यात बिझी होत्या. तास झाला असला तरी आत्ताच ऑफिसमधून आल्याचे अहोंचे कारण ताजेच होते, शिवाय मुलांबरोबरची चर्चा झाल्यावर आता टीव्ही वर योग आणि योग्य आहारविषयक कार्यक्रम बघणे त्यांना क्रमप्राप्तच होते. त्यामुळे राहता राहिले मीच, मी जिम मधेही जात नाही, अभ्यासही करत नाही आणि टीव्ही बघायला मला अक्खा दिवस मोकळाच असतो त्यामुळे पिशव्या घेऊन मीच बाहेर पडले. यामुळे माझा वॉक तर होईलच पण वेट उचलल्यामुळे स्नायूही बळकट होतील याचीही यांनी आठवण करून दिली.

दुसरा दिवस उजाडला, नेहमीपेक्षा थोडा लवकरच. यांच्या पाचच्या गजराने मला जाग आली. आमच्याकडे सर्वांनाच कानाचा थोडा त्रास आहे. सिलेक्टेड गोष्टीच त्यांना ऐकू येतात. त्यामुळे गजर ऐकून उठून मग यांना उठवणे या कामावरही माझीच नेमणूक झाली होती. तेवढ्यात आठवले, उठल्यावर लिंबू पाणी. यांच्या चेहऱ्यावर 'चहा … चहा …. ' असे स्पष्ट लिहिलेले मला दिसत होते पण ठरल्याप्रमाणे लिंबू पाणी घेऊन बूट घालून ते बाहेर पडले. चला आता डाळींबाचा ज्यूस. मी स्वयंपाकघराकडे वळले. अर्धवट पेंगलेल्या डोळ्यांनी डाळिंब सोलणे, दाणे काढणे आणि मग ज्यूस, हे काही सोपे नाही. गरजूंनी खात्री करून घ्यावी. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत असतो. दुध तापवणे, डब्यासाठी भाजी चिरणे, फोडणीला टाकणे, कणिक भिजवणे आणि पोळ्या या फास्ट ट्रेनच्या आड असे वेळखाऊ मालगाडी काम आले कि सगळा तालच बिघडतो. हे येईपर्यंत ओट्यावर दोन डाळींबाची कत्तल होऊन अर्धा ग्लास ज्यूस तयार झाला होता. त्याचबरोबर माझा मार्बलचा ओटा, शेगडी, भिंत यावर लाल शिंतोड्यांची  कलाकृती आणि माझ्या हातावर चिकट राप हे साईड इफेक्ट्स सुद्धा प्रेक्षणीय होते. ज्यूस पिउन झाल्यावर हे अंघोळीला गेले.

तोवर कन्यारत्न उठले. तिची सकाळची शाळा, त्यातून आज शुक्रवार म्हणजे डब्यात काहीतरी खास हवे. 'आई, सगळ्याजणी किती छान काय काय आणतात, नुडल्स, पास्ता, पिझा'. असे बरेच वेळा ऐकून झाल्यामुळे मी इडलीचे पीठ आणून ठेवले होते. गरम गरम वाफाळत्या इडल्या काढत असतानाच हे आवरून आले. एक क्षण इडलीचा मोह नक्कीच झाला असणार पण दुधात बेचव कोर्नफ्लेक्स खाणेच आज नशिबी होते न. आजच तुला इडली करायची होती, अश्या नजरेने माझ्याकडे पाहून अनिच्छेने कोर्नफ्लेक्सचा चमचा यांनी तोंडात घेतला. तोवर चिरंजीवही उठून आले. त्याचे तंत्र यांच्या उलट. 'माझ्या उंचीच्या मानाने अजून थोडे वजन वाढले पाहिजे असे काल सांगत होते सर, माझ्या प्रोटीन शेक मध्ये एक बनाना पण घाल आज' अशी सूचना देऊन ते बाथरूम मध्ये घुसले. गरजेप्रमाणे वजन वाढवणे, कमी करणे, पौष्टिक असूनही चविष्ट असणे, नवीन वेगळे असणे आणि तरीही पटकन बनणे हे सारे गुणधर्म असणाऱ्या पदार्थाचा शोध कोणी लावला तर कित्ती छान होईल असा विचार सकाळ भर माझ्या मनात घोळत होता. डाळिंब सोलताना, ज्यूस काढताना, ओटा पुसताना, इडली बनवताना, कोर्नफ्लेक्स दुधात ओतताना आणि प्रोटीन शेक घुसळतानाही. हे सर्व होईपर्यंत सात वाजून गेले आणि तरीही पोळीभाजीचा पत्ताच नव्हता. शिवाय गाजर, काकडीचे काप करणे बाकीच होतेच. मुरारबाजीच्या आवेशाने या विरांगनेने मग साऱ्या कामांचा फडशा पडला. भरभर डबे भरून वेळेवर सगळ्यांना बाहेर धाडले. आणि मग सकाळपासून खुणावत असलेला कॉफीचा मग आणि वर्तमानपत्र हातात घेऊन निवांत बसले. सकाळचे सत्र तरी छान पार पडल्याचे समाधान होते. पण कॉफी संपवून आत गेल्यावर तेही संपुष्टात आले. बाई यायच्या आत स्वयंपाकाची सारी भांडी मोकळी करून द्यायला हवी. घरातल्या बाईला मोलकरीण बाईपेक्षा मोठा धाक कोणाचाच असत नाही. मुकाट्याने तिथली आवराआवरी करून जरा थकूनच बाहेर सोफ्यावर येउन बसले आणि तिची बेल वाजलीच.

संध्याकाळी हे घरी आले, तेव्हा कालचा उत्साह जरा मंदावलेलाच वाटला. पण निश्चय कायम होता त्यामुळे मोड आलेले मुग मीठ आणि लिंबू घालून पोटात गेले. 'वैशु, आज जास्त फिट वाटतोय का ग मी? एकदम हलकं हलकं वाटतंय. त्या मूर्ख देशपांडेबाईमुळे थोडे कुपथ्य झाले. मुलाला नोकरी लागल्याचे पेढे घेऊन आली होती. मी नको म्हणून बघितलं पण चार चौघात वाईट दिसत न, त्यामुळे खावा लागला पेढा.' 'पण संयम ठेवायचा न थोडा, घरी घेऊन यायचा पेढा. पहिल्याच दिवशी नियम मोडलात.' मी म्हटलं पण पेढा समोर दिसल्यावर असं काही सुचणं यांना शक्यच नव्हतं हे मी हि जाणून होते. मी रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. हे फक्त भाजी भाकरी खाणार असले तरी बाकी सर्वांसाठी बाकीचं जेवण करणं भाग होतं.

त्या दिवसापासून आमच्या घरी रोज नवे ज्यूस बनु लागले, रोज नव्या कडधन्यांना मोड येऊ लागले. भाज्यांच्या तेल विरहित, कमी गुळ, कमी मिठाच्या पाककृती सुचवल्या जाऊ लागल्या. कच्च, शिजेलेलं, भाजलेलं सर्व पदार्थातील क्यालरीज मोजल्या जाऊ लागल्या. पदार्थ पौष्टिक, चविष्ट आणि लो क्यालरी कसा बनेल यावर चर्चासत्रे घडू लागली. घरात दोन तरुण वाढती मुलं असल्यामुळे त्यांच्या भुकेला खाद्य देणे हे मातृकर्तव्य पार पाडणं हि तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत माझं किचन काही सुटेना. दुधवाल्याने गायीऐवजी म्हशीचे दुध टाकलेय, मटकी ला मोडच आले नाहीयेत, भाकरीचं पीठच संपलंय अशी भीतीदायक स्वप्न मला पडू लागली. पण हळूहळू लक्षात आलं, हा diet plan मी जेवढा मनावर घेतला होता तेवढा आणखी कुणीच घेतला नव्हता.

सकाळचा पाचचा गजर पूर्वीसारखा सहाचा झाला होता, पाऊस सुरु झाल्याचे कारण देऊन जॉगिंग चे बूट खणात गायब झाले होते. सकाळी मला दोन दोन नाश्ते बनवायचा त्रास नको च्या नावाखाली बेचव कोर्नफ्लेक्स बंद झाले होते. मुलांसाठी म्हणून केलेला भरपूर क्यालरीयुक्त पदार्थ 'बघू जरा चव' असं म्हणून चापला जाऊ लागला. चहा तर दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा सुरु झाला होता. येउन जाऊन 'तू कशी diet plan फॉलो करत नाहीस, तुला कशी प्रकृतीची काळजीच नाही, तुला कसा व्यायामाचा आळसच आहे' हे ऐकवणं मात्र चालू होतं. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं, diet हा मुख्यत्वे पाळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. सर्व खातात ते अन्न न खाता, वेगळे पदार्थ खाणे किमानपक्षी त्याच्यावर बोलणे जमले कि झाले. घरात खाद्यपदार्थ बनवणारी व्यक्ती दुसरी असेल तर आणखीच छान. मग व्यायाम हि एकच जबाबदारी उरते, आणि तोही रोज करणे सहज टाळता येते. वेळच नाही, पाऊसच आहे, पायच दुखतायत, व्यायामाचे कपडेच वाळले नाहीत अशी अनेक कारणे अभ्यासुंनी शोधून काढली आहेत. मग असं diet करून वजन कमी झालं तरच नवल.

त्यामुळे एका संध्याकाळी हे बरोबर दोन मित्र आणि वडापावचे पार्सल घेऊन आले तेव्हा मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. 'अग ऐकलंस का वैशु, आज माझं diet सुरु होऊन एक आठवडा पूर्ण झाला, त्याबद्दल बक्षीस म्हणून आज वडापाव पार्टी करू आपण. तू जरा चहा ठेव बघू' यांनी पार्सल माझ्या हातात देत म्हटलं. 'वाहिनी, diet याचं चालू आहे म्हणतोय पण तुम्ही जास्त स्लिम दिसताय. इसका राज क्या है?' यांच्या मित्राने विचारलं. सकाळी लवकर उठून धावपळ, भाजीपाला फळे यासाठी झालेल्या जास्तीच्या फेऱ्या, दळण, सामानाच्या पिशव्यांचे वेट लिफ्टिंग सारे माझ्या डोळ्यासमोर चमकून गेले. आणि स्लिम दिसण्याचा राज म्हणून 'यांचा diet plan' असे अतिशय खरेखुरे उत्तर माझ्या सस्मित मुखातून बाहेर पडले.








Monday, 6 July 2015

कबुली

मी डॉ. नरेश काळे. मानसोपचारतज्ञ. दवाखान्याची वेळ संपतच आली होती. मी नंदिताला फोन करून शेवटच्या पेशंटला आत पाठवायला सांगितले. 'बोला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी?' मी त्या बाईंना विचारले. 'डॉक्टर, मी माझ्या मुलाची केस घेऊन तुमच्याकडे आले आहे. मी डॉ. वसुंधरा सबनीस.' नाव नक्कीच ओळखीचे होते. 'ओह! मी म्हटले,' म्हणजे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. वसुंधरा सबनीस तुम्हीच का?' 'होय मीच. मला तुमची मदत हवी आहे. माझा मुलगा भास्कर, भास्कर सबनीस हा देखील एक हुशार जीवशास्त्रज्ञ आहे. लंडन मध्ये शिक्षण पूर्ण करून चार महिन्यांपूर्वी इथेच माझ्याबरोबर काम सुरु केलय त्याने. आम्ही दोघ मिळून एक अत्यंत महत्वाचं, जीवशास्त्रात क्रांती करेल असं संशोधन करत आहोत. दोन महिन्यापूर्वी अदिती आली. तीही जीवशास्त्राची एक हुशार विद्यार्थिनी आहे. तिची मेहनत आणि हुशारी पाहूनच मी तिला आमच्या मुख्य संशोधनात सहभागी करून घेतलं. काम करता करता ती भास्करच्या खूप जवळ आली. भास्करने एक दिवस मला सर्व सांगितलं. माझी परवानगी नसण्याचं काही कारणच नव्हतं. मी आनंदाने दोघांचा साखरपुडा करून टाकला. पण हळूहळू सगळं बदलत गेलं. एक दिवस त्याने अदितीला त्याच्या नकळत काही नोट्स घेताना पाहिलं. मला वाटतं तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली.' इथे त्या जरा थांबल्या. मग पुन्हा बोलू लागल्या, ' गेले काही दिवस भास्कर खूप विचित्र वागतोय. संशयी झालाय, त्याच्या प्रयोगशाळेत कुणीच गेलेलं त्याला चालत नाही. पूर्वी आमच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल आमची अनेकदा चर्चा व्हायची. तो त्याचे अंदाज, निरीक्षणे सांगायचा, माझं मत विचारायचा. पण आता असं काहीच होत नाही. तो विषय निघाला कि तो एकदम सावध होतो. कालचा त्याचा चेहरा, आवाज आठवला कि अजूनही काटा येतो अंगावर. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. अदिती बाजूला उभी होती. बराच वेळ शब्दही बोलला नव्हता, पण मग एकदम कर्कश आवाजात ओरडला, 'माझा विश्वास नाही तुम्हा कोणावरच. तुम्ही सारे माझं संशोधन चोरायला टपला आहात. पण मी माझं मोलाचं काम तुमच्या हाती नाही लागू देणार ..... कधीच नाही.' अजून आठवतोय तो चेहरा- डोळ्यात संशय, भीती आणि राग. अदिती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा मला पहिल्यांदा तिचा संशय आला. ही तर अस काही करत नसेल न? भास्करनी एकदा तिला कागद चाळताना पाहिलेलं होतं. पण मी? माझ्यावरही संशय? कि तिने विश्वासघात केल्यामुळे तो मनःशांती हरवून बसला? काही कळेनास झालंय मला. मला मदत करा आणि माझ्या भास्करला यातून बाहेर काढा.' त्या थांबल्या. डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. 'मी नक्की भेटेन भास्करला' मी त्यांना धीर दिला. त्यांच्या विनंतीवरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी जाण्याचे मी कबुल केले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरोबर पाच वाजता मी डॉ. सबनिसांच्या बंगल्याशी पोचलो. बंगल्याला लागुनच प्रयोगशाळेची बैठी इमारत होती. डॉ. वसुंधरा स्वतः दार उघडायला आल्या, आम्ही आत आलो. भास्कर मला भेटायला तयार नव्हता. मला याचा अंदाज होताच. मी म्हणालो, ' काही हरकत नाही, आपण असे करू, त्तुम्ही त्याला सांगा, मी काहीही प्रश्न विचारणार नाही. त्याने केवळ बाहेर यावे. माझ्यामुळे त्याला त्रास होतोय असे वाटले तर खुशाल निघून जावे, मला काही वाटणार नाही'.

माझा निरोप आत गेल्यानंतर दहा मिनिटांनी भास्कर बाहेर आला. त्याची संशयी नजर सगळीकडे भिरभिरत होती. 'काळजी करू नकोस भास्कर, यांना सांग सगळं.' डॉ. वसुंधरा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. त्याबरोबर तो दचकला. त्याने खांद्यावरचा हात झटकून टाकला. खुर्ची मागे करून झटकन उभा राहिला. ' हात लाऊ नकोस मला, तू लांब जा, कुणी जवळ यायचं  नाही माझ्या. का जाऊ मी?' भास्कर जवळ जवळ किंचाळून बोलला. ' नाही नाही, तू जाऊ नकोस, मीच जाते हव तर' एवढे बोलून त्या आत निघून गेल्या.

'हेल्लो, मी डॉ. नरेश काळे. प्रथम तुमचं अभिनंदन भास्कर' मी हात पुढे करत म्हटल. 'परदेशात उच्च शिक्षण घेऊनही तुम्ही इथे काम करायचा निर्णय घेतलात. सोपं नाही ते.' भास्कर चा चेहरा थोडा निवळला. 'डॉक्टर मला माहित आहे ममीने तुम्हाला का बोलावलंय ते. तिला वाटतंय मला भास होतायत. पण तसं नाहीये, मला पक्की खात्री आहे. माझं संशोधन चोरण्याचा प्रयत्न चालू आहे.' तो इकडे तिकडे पाहत घाईघाईने बोलू लागला, ' मी बघितलंय, मी नसताना माझं काम, माझी निरीक्षणे, माझे निष्कर्ष पहायचा प्रयत्न करतेय ती. माझं श्रेय लाटायचंय तिला.' 'पण कोणाला?' मी न राहवून विचारलं. त्याने ऐकलं कि नाही कुणास ठाऊक पण स्वतःशीच बोलल्यासारखा तो हळू पण घाईघाईने बोलत राहीला, 'डॉक्टर विश्वास ठेवा माझ्यावर, मला होताहेत ते भास नाहीयेत. माणसाच्या मेमरीमधील ज्ञान अमर ठेवण्यासाठी संशोधन करतोय मी. मेंदूच्या मज्जासंस्थेमध्ये साठवलेले ज्ञान दुसरीकडे स्थलांतरित कसे करता येईल यावर काम चालू आहे माझे. माझा क्रांतिकारक शोध तिला आयता हवा आहे आणि तोही स्वतःच्या नावावर. मी ते कधीच होऊ देणार नाही. कोणावरच आता विश्वास नाहीये माझा. कोणावरच.' तेवढ्यात डॉ. वसुंधरा परत आल्या, मग पुढे काही बोलणे झाले नाही.

त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. भास्कर सांगतोय त्यात तथ्य असेल का? एकदा आदितीशी बोलायला हवं, पण कसं ? पण त्याचीही वाट पहावी लागली नाही. मी क्लिनिक वर पोचतोय तो अदितीच माझी वाट पाहत होती.
मी आत येताच तिने बोलायला सुरुवात केली. ' डॉक्टर, मी अदिती. मी डॉ. वसुंधरा सबनिसांच्या प्रयोगशाळेत सहायक म्हणून काम करते. तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला- नोकरी मिळाल्यावर खूप खुश होते मी. माझं आणि भास्करच ट्युनिंग हि छान जमलं होतं. भास्कर माझ्याबरोबर जास्त वेळ घालवतोय, त्याच्या प्रयोगांबद्दल ममींपेक्षा जास्त माझ्याशी चर्चा करतोय हे हळूहळू ममींना जाणवायला लागलं आणि ते त्यांना आवडत नव्हतं. संशोधनात त्याने त्यांच्यापेक्षा माझ्यावर विश्वास दाखवावा हे त्यांना सहन झालं नसावं, आणि मग त्यांनी भास्करचे कान माझ्याविरुद्ध फुंकण्यास सुरुवात केली. माझ्यावर संशोधन-चोरीचे खोटे आरोप केले. सुरुवातीला भास्करला ते पटले आणि त्याने मला प्रयोगशाळेत यायची बंदी केली. एक दिवस मी माझं सामान न्यायला गेले तेव्हा ममी त्याची कागदपत्रे पाहत होत्या. मी त्यांच्या नकळत ते भास्करला दाखवल तेव्हा मात्र भास्कर चमकला. मी समजावले त्याला, त्याचं संशोधन चोरण्याचा प्रयत्न करणारी त्याची आईच आहे. तुम्हाला माहित नसेल कदाचित पण गेल्या बऱ्याच वर्षात त्यांच्या नावावर कोणतेही नवीन संशोधन नाहीये. या शोधाची नितांत गरज आहे त्यांना. त्यांना पक्के माहित आहे, भास्कर त्याचे संशोधन दुसऱ्या कोणाच्याही नावाने प्रसिद्ध होऊ देणार नाही. कधीच नाही. म्हणून अश्या मार्गाने त्या प्रयत्न करतायत. सख्ख्या आईचा विश्वासघात फार लागला त्याच्या मनाला. खूप त्रास झाला त्याला आणि त्यानंतर त्याचे विचित्र वागणे सुरु झाले. फक्त अविश्वास आणि संशय… असेच चालू राहिले तर तो कामच करू शकणार नाही आणि सारे काही डॉ. वसुंधरांच्या हातात आयते जाईल. डॉ. वसुंधरांची हि दुसरी बाजूहि तुम्हाला माहित असावी म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. प्लीज आम्हाला मदत करा.'

ती निघून गेली पण मी मात्र पुरता चक्रावून गेलो. आतून जाणवत होते, कोणीतरी काहीतरी चुकीच करण्याचा प्रयत्न करतंय. मी फोन करून भास्करला बोलावून घेतले. माझ्यावर विश्वास ठेवून तो आला. आम्ही दोघांनी बराच वेळ चर्चा केली. माझी आता पूर्ण खात्री पटली कि भास्करला होणारे भास हे डॉ. वसुंधरानी शोधलेलं एक निमित्त होतं, त्याला त्याच्या संशोधनापासून बाजूला ठेवण्यासाठी. पण मी असं होऊ देणार नव्हतो. मी भास्करला समजावलं, कि त्याने डॉ. वसुंधरांशी स्पष्ट बोलावं आणि पुन्हा असं न करण्याची समज द्यावी अन्यथा मानहानीची किंवा अखेर पोलिसांची भीती घालावी. याने काम झालं नाही तर मी होतोच. पण तशी वेळच आली नाही.

२-३ वर्षे झाली असतील या गोष्टीला. आज सकाळीच मेडिकल जर्नल मध्ये मी भास्करचा फोटो पहिला आणि त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दलही वाचलं. अखेर ज्याचे श्रेय त्याला मिळाले. मग माझी नजर आलेल्या पत्रांकडे गेली. एक पत्र अदितीकडून आले होते. माझ्या मदतीबद्दल आठवणीने पत्र पाठवलेय बहुदा. पत्र उघडून मी वाचू लागलो.

'नमस्कार डॉक्टर, मी अदिती, मिसेस अदिती भास्कर सबनीस. तुम्हाला कदाचित कळले असेल, आमचे संशोधन पूर्ण झालेय. भास्करच्या पेपरला मेडिकल जर्नल मध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. आमच्या शोधामुळे मेंदूच्या मज्जासंस्थेतील ज्ञान स्थलांतरित करता येईल अशी शक्यता निर्माण झालीये. उंदारांवरील प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय.…  हो, पण माणसावरचा मात्र कुणाला माहीतही नाही … काही गोष्टी तुम्हाला सांगायला हव्यात, मी तुमच्याकडे भास्करची बाजू मांडायला आले होते, तेव्हा जे काही बोलले ते खरेच होते. पण नंतर हळूहळू मला त्यातील फोलपणा जाणवायला लागला. तुमचे ठरल्याप्रमाणे भास्कर ममींशी स्पष्ट बोलला. त्यांच्या तोंडावर तो त्यांना चोर म्हणाला. ते ऐकून ममी कोसळल्याच. त्यानंतर ममींनी अंथरूण धरलं ते कायमचंच. मी आणि भास्कर पुन्हा एकत्र काम करू लागलो. हळूहळू भास्करच्या बुद्धिमत्तेचा तोकडेपणा माझ्या लक्ष्यात येऊ लागला. तो जरी लंडनला जाऊन शिकून आला होता, तरी नवीन विचार मांडण्याची त्याची क्षमता नव्हती. सर्व प्रयोग माझ्या हुशारीने मी पुढे चालवत होते. आता तुम्ही म्हणाल कि तो हुशार नसता, तर मुळात हा शोध कसा लावू शकला? तर आता नीट ऐका- हे संशोधन त्याचं नव्हतं, कधीच नव्हतं. ते सुरु केलं होतं डॉ. वसुंधरांनी. भास्कर इतक्या बुद्धिमान जीवशास्त्रज्ञाचा मुलगा, पण भरीव असं काहीच करू शकला नव्हता आणि नसता त्यामुळे ममींनी त्याला आपल्याबरोबर कामाला घेतलं. ममींचे प्रयोग पहात असताना एक विकृत विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. ममींचं संशोधन त्याला हवं होतंच पण त्यांच्या मेंदूतील सारं ज्ञानच घेता आलं तर? कितीतरी कीर्ती, प्रतिष्ठा त्याला एकट्याला मिळाली असती, पुढेही. त्याच्या मनात योजना तयार होऊ लागली. आधी स्वतःला भास होत आहेत असा समज त्याने करून दिला. आम्ही दोघीही त्याच्या नाटकाला फसलो. पण तुम्हीही फसलात तेव्हा तो खरा जिंकला. तुमचा सल्ला त्याच्यासाठी विनिंग शॉट ठरला. तुमच्या सल्ल्याप्रमाणे तो ममींशी बोलला आणि त्या अंथरुणाला खिळल्या, बाजूला झाल्या. सर्व त्याच्या मनासारखं होत होतं. त्यांच्या जिवंतपणीच प्रयोग पूर्ण होणं गरजेचं होतं कारण मृत्युनंतर त्यांचा मेंदू निकामी झाला असता. वैज्ञानिक, सामाजिक नियमांच्या विरुद्ध माझ्या मदतीने ममींच्या मेमरीतील ज्ञान त्याने स्वतःच्या मेंदूत स्थलांतरित केले. या प्रयोगानेच डॉ. वसुंधरांचा बळी घेतला. ममींची सारी बुद्धी, सारं ज्ञान आता त्याचं झालं. त्याने संशोधन पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. पुढचं सगळं तुम्हाला माहित असेलच. आता त्याच्या मेंदूत दोन व्यक्तींच्या आठवणी आहेत, त्याचा त्रास हळूहळू वाढतोच आहे. कदाचित हीच त्याची शिक्षा आहे. पण माझं मन मला आतल्या आत खातंय. या खोटेपणात माझाही सहभाग आहे हे मी विसरू शकत नाही. हे सारं सिद्ध करण्यासाठी पुरावा काहीच नाही पण तरीही तुमच्याजवळ कबुली द्यायचीये मला. त्यानेतरी शांत वाटेल मला, thanks - अदिती.'
पत्र संपल. अदितीने मला हे सांगून तिच्या मनाची शांतता थोडीतरी परत मिळवली असेल, पण आता मी काय करू? माझ्या चुकीची कबुली मी कोणाकडे देऊ?