Thursday, 4 May 2023

बुद्धिबळ - स्वतःचे स्वतःशीच!


लेखक लोकांना बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो; तुम्हाला सुचतं कसं बुवा! काही वेळा अंतःस्फुर्तीने काही गोष्टी लिहिल्या जातात. डोक्यातले विचार आणि लिहिण्याचा वेग यांचा उत्तम ताळमेळ जमतो आणि बघता बघता एखादा लेख, एखादी कविता, कथा कागदावर उतरते. ही झाली आदर्श आणि लोकांच्या मनात असलेली लेखन क्रियेविषयीची प्रतिमा. प्रत्येक वेळी ही अवस्था अनुभवणारे लेखक भाग्यवान! आम्ही बाकीचे मात्र कधीतरी अनुभवलेल्या या अवस्थेची आराधना करत राहतो. कारण आमच्या बाबतीत बरेचदा होते ते असे..
शेंडा बुडखा नसलेली एखादी कल्पना मनात रुंजी घालत असते. पण ती कागदावर उतरायची तर तिला मूर्त रूप द्यायला हवं. ते देण्यासाठी आधी तिला काय कोंदण शोभेल याचा विचार करायला हवा. म्हणजे कविता, ललित असं काही नाजूक, की लेख, कथा असं काही भक्कम. किंवा आत्मविश्वासाचं पाकीट बऱ्यापैकी फुगलेले असेल तर कादंबरी, नाटकासारखं काही भारी! एकदा कोंदणाची निवड झाली की मग त्या हिशोबाने जमवाजमव सुरू होते. तुम्ही म्हणाल, विषय आहे, कोंदण ठरलं आहे; आता नुसतं भराभरा लिहून काढायचं. हाय काय अन् नाय काय!
पण नाही ना..! लिहायला सुरुवात होते आणि एक दिवस मध्येच गाडं अडतं. सुरुवातीपासून एकमेकांत छान विणले जाणारे पात्रांचे, कथानकाचे दोरे एकमेकांत गुंतू लागतात. दुभंगू लागतात किंवा चक्क हट्टीपणा करत पोतच बदलू लागतात. अचानक पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अश्या वेळी फिरून पुन्हा मागे जाणे हा एक उपाय असतो. पण आम्ही पडलो हट्टी! मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा अंगात संचारतो. काही केल्या मागे जाणार नाही. यातूनच मार्ग काढून पुढे जाईन तरच खरी! अशी भीष्म प्रतिज्ञा केली जाते आणि मग सुरू होतो एक रोमांचक खेळ!
माझ्या लहानपणी आमच्या घरी नेहमी बुद्धिबळाचा पट एका टेबलावर मांडून ठेवलेला असायचा. ज्या बाजूची चाल असेल त्या बाजूला खूण असायची. जाता येता माझे वडील, भाऊ पुढची चाल खेळायचे. असा हा डाव कित्येक दिवस सुरू असायचा. घरातल्या खेळाडूंच्या या निःपक्षपाती खेळाविषयी मला नेहमी कुतूहल वाटायचे. एका संघाला झुकते माप न देता दोन्ही बाजूंनी खेळणे कसे शक्य आहे असे वाटायचे. पण त्यांचा तो खेळ खूपच रंगायचा कारण तो अत्यंत प्रामाणिकपणे खेळला जायचा.
आज वाटले, लेखनाच्या बाबतीतही असेच आहे की! स्वतःच निर्माण केलेल्या व्यूहरचनेतून मागे न वळता पुढे जायचे तर सर्व संबंधित बाबींचा विचार हा नि:पक्षपातीपणे करता यायला हवा. पळवाट काढणे कितीही सोयीचे वाटले तरी दोन्ही बाजूंना योग्य न्याय मिळेल याची काळजी घेता यायला हवी आणि त्यासाठी स्वतःच स्वतःशी असे प्रामाणिकपणे बुद्धिबळ खेळता यायला हवे. डाव पूर्ण व्हायला कितीही दिवस लागले तरीही! तो आपल्याला अपेक्षित असाच पूर्ण होईल याची खात्री नसली तरीही! आणि पूर्ण झाल्यावर तो कुणाच्या पसंतीस उतरेल की नाही याची शंका मनात असली तरीही! हा झगडा म्हणजेच कदाचित लेखकाचे प्राक्तन असावे. कारण सर्जनाची उर्मी जोवर आहे तोवर तिला प्रामाणिकपणे वाट करून देणे हेच त्याचे कर्तव्य नाही का!
© स्वरा
All reactions:
Swati Bhanage Joshi, Pranav Joshi and 19 others

आज जागतिक पुस्तक दिन! 23 April 2023


पुण्यात ज्या भागात आम्ही राहतो तिथे जवळपास ग्रंथालय नाही. जी आहेत तिथे मराठी पुस्तकांचा पुरेसा साठा नाही त्यामुळे वाचन काही काळ मागे पडले होते. पण गेल्या वर्षी विनया चल ग्रंथालय या फिरत्या ग्रंथालयाबद्दल कळले आणि लगेच त्याचे सभासदत्व घेतले. श्री व सौ डोईफोडे पुण्यात हे ग्रंथालय चालवतात. दर महिन्याला आपल्या आवडीची पाच पुस्तके घरपोच वाचायला मिळतात. हा उपक्रम विनया चल ग्रंथालय गेली सात वर्षे चालवत आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याला जाण्याचा योग आला आणि समानशील पुस्तकप्रेमिंना भेटून हरवलेले काहीतरी सापडल्याची जाणीव झाली.
आज कितीही नाही म्हटले तरी काही प्रमाणात आपण सर्वच फोन या तुलनेने नवीन असलेल्या खेळण्याच्या कह्यात जाऊ लागलो आहोत. तो सतत आवाज करतो, गाणी ऐकवतो, रंगीबेरंगी चित्रे, मजेदार व्हिडिओ दाखवतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्याची खबरबात देतो. त्यामुळे या एकाच खेळण्यात आपण तासनतास रमून जातो. पण ते बाजूला ठेवले की लक्षात येते अरे! आपण एवढा वेळ घालवून मिळवले काय? जेमतेम दहा वीस सेकंद पाहून बोटाने चित्र बदलत राहणारे आपण केवळ बाह्यतः रमलेलो असतो. पण आत काही मुरावे इतका वेळ आपण त्यातील एकाही गोष्टीला दिलेला नसतो त्यामुळे बरेचदा मिळकत शून्य असते.
याउलट पुस्तक ना आवाज करते, ना गाणी ऐकवते, ना व्हिडिओ दाखवते ना काही खास खबर देते. मग करते काय? तर एक चांगले पुस्तक एकेका शब्दागणिक आपल्या मनात उतरत असते. बाकी कुणालाही ऐकू न येणारा लेखकाचा आवाज फक्त आपल्या कानांना ऐकू येतो. लेखिकेने वर्णन केलेली दृश्ये फक्त आपल्या डोळ्यांसमोर उलगडू लागतात. समोर साकारू लागलेले ते नवे विश्व कधी विचारांना चालना देते तर कधी भावनेला हात घालते. म्हणाल तर समोर असतात पांढऱ्या कागदावर छापलेले काळे शब्द; मग आपल्या मन:चक्षुंपुढे असे अद्भुत, बहु मितीय काहीतरी उभे करण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून?
पुस्तकातले शब्द हे लेखकाच्या अनुभवाचा, वाचनाचा, कल्पनेचा आणि कलेचा अर्क किंवा परिपाक असतत. नवनिर्मितीच्या वेणा भोगून ते जन्माला आलेले असतात. लेखक नावाच्या सर्जकाचा अनुभव त्याच्या शब्दांतून प्रवाही तर होतो पण तो पूर्णत्वास जाण्यासाठी वाचक नावाच्या माणसाची गरज असते. वाचणारा वाचकही तितकाच सावध असावा लागतो. त्यामुळे आपण जरी केवळ मनोरंजनासाठी वाचत असलो तरी पुस्तक हे आपल्या मेंदूला कार्यमग्न ठेवत असते. वाचकाचा मेंदू लेखकाच्या शब्दांत आपले स्वतःचे असे काहीतरी मिसळून स्वतःचा नवा अर्थ निर्माण करत असतो. म्हणूनच एकच पुस्तक प्रत्येक वाचकाला निराळे भासू शकते. विचारांना चालना आणि सर्जनाला प्रोत्साहन देणारी ही क्रिया आहे. आणि म्हणूनच फोनवरच्या निष्क्रिय रंजनापेक्षा ती कैक पटींनी श्रेष्ठ आहे.
आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने हेच सांगणे की आपल्या मनाचेही आरोग्य जपुया आणि आपल्या मेंदूला निष्क्रिय रंजनापेक्षा सक्रिय रंजनाकडे वळवायचा प्रयत्न करूया!
© स्वरा